बीग बींनी दिला मदतीचा हात
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बिग बी हे वीरपत्नी आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची आर्थिक मदत करणार आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत.
ही मदत योग्यप्रकारे गरजूंपर्यंत पोहोचावी यासाठी स्वत: त्यांनी एक टीम तयार केली आहे. हे पैसे त्या-त्या लोकांपर्यंत पोहोचावेत आणि वितरणाचे काम कोणत्याही अडथळ्यांविना व्हावे यासाठी ही टीम काम करणार आहे.
अमिताभ बच्चन यांच्या मते शेतकरी आणि देशाचे जवान हे समाजाचे असे घटक आहेत, ज्यांना कधीच दुर्लक्षित करू नये.
याआधीही त्यांनी आंध्र प्रदेश आणि विदर्भातील काही शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती व्हावी यासाठी मदत केली होती. बिग बी परोपकारी कार्यासाठी नेहमीच पुढे सरसावतात. त्यांचा पोलिओ निवारण, क्षयरोगाबाबत जनजागृती आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या सामाजिक कार्यात मोलाचा वाटा आहे.