breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘बीएचआर’ बॅंकेचा तब्बल 1100 कोटींचा घोटाळा, बड्या मंडळींनी मातीमोल भावात मालमत्ता घेतल्या – एकनाथ खडसे

जळगाव –  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा खुलासा केला आहे. भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेचा तब्बल 1100 कोटी रुपयांचा घोटाळा उजेडात आणला आहे. या घोटाळ्यात बड्या मंडळींनी मातीमोल भावात बँकेच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. पोलीस तपासात त्यांची नावं समोर येतील, असा दावा खडसे यांनी दिली.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन हा भांडाफोड केला आहे. बड्या नेत्यांनी हे प्रकरण पध्दतशीरपणे दडपून टाकल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. अगदी दिल्लीहून चौकशीचे दिलेले निर्देश सुध्दा पाळण्यात आले नसल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे.

खडसे म्हणाले की, बीएचआर सहकारी बँकेतील घोळ उघडकीस आल्यानंतर २०१७ साली आपण तक्रार केली होती. याप्रसंगी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले. यानुसार रक्षा खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार केली. यानुसार राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधित खात्याकडे तक्रार केली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप, एकनाथ खडसेंनी केला. अ‍ॅड. किर्ती पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणी पाठपुरावा करत असल्याची माहिती खडसे यांनी दिली.

खडसे म्हणाले की, मी प्रशासक जितेंद्र कंडारे यांना भेटलो. यानंतर माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. यात अकराशे कोटी रूपयांच्या मालमत्ता मातीमोल भावात घेतल्याचे दिसून येत आहे. यात डिपॉजिटच्या रिसीट या ३०-४० टक्के दलालांच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. यात अनेक मोठ्या मंडळींनी मालमत्ता घेतल्याची माहिती असून याबाबतचे विवरण हे पोलीस तपासातून समोर येणार आहे, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.

हे प्रकरण खूप मोठे असून जवळपास दोन ट्रक इतकी सामग्री जप्त करण्यात आली. यातून दोषींची अचूक माहिती मिळण्यासाठी तपास हा वेगाने केला तरी जवळपास एक-दोन महिने लागू शकतात, अशी माहिती खडसे यांनी दिली.

राधामोहन सिंगांनी दिलेले चौकशीचे निर्देश दडपले

राधामोहन सिंग हे केंद्रीय सहकार मंत्री असतांना त्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. मात्र, ही चौकशी करण्यात आलेली नाही. पोलिसांवर राजकीय दडपण असल्याने ही चौकशी वरवर करण्यात आली. यात दिल्ली येथे सुरू असणारी चौकशी सुध्दा दडपण्यात आली. २०१८ पासून चौकशीचे निर्देश दडपण्यात आले असले तरी आता मात्र याचा गौप्यस्फोट झाला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

प्रकरण दडपण्यासाठी सुभाष देशमुखांवर दबाव

तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना भेटलो असता त्यांनी त्यांच्यावर दडपण असल्याचे नमूद केल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. या प्रकरणात जळगाव, जामनेर, पुणे आदींसह अन्य शहरांमधील मालमत्ता या कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत ठेवीदारांचा पैसा मिळणार नाही, तोवर आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. सरकारने कोणत्याही दडपणाला बळी न पडता सत्य समोर आणावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच सुनील झंवर यांच्याकडे नेत्यांचे लेटरपॅड कसे आले ? वॉटरग्रेसची कागदपत्रे तेथे कशी आली ? तेथून पगार कसे दिले जात होते ? याचा महापालिका व जिल्हा परिषदेशी संबंध कसा आहे, याची माहिती तपासात समोर येईल असे ते म्हणाले. या प्रकरणी आम्ही प्रक्रियेनुसार तक्रारी करून पाठपुरावा केला तरी यावर अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या सुरू असणार्‍या कारवाईमुळे ठेवीदारांना न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button