बिहारमध्ये भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, चौघे जखमी
नवी दिल्ली | बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग २८ वर समरसपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. स्कॉर्पिओमध्ये एकूण १४ प्रवासी बसले होते. हे सर्वजण कामगार होते, अशी माहिती आहे. स्कॉर्पिओ गाडी उत्तर प्रदेशातून आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पंचनामा करण्यात येत आहे.
या घटनेनंतर या महामार्गावर काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील अनेक जण आले होते. कांटी ठाण्याचे पोलिस अधिकारी रविंद्र कुमार यांनी हा अपघात शनिवारी पहाटे पाच वाजता झाल्याची माहिती दिली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.