‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’; आठवीच्या पुस्तकात वादग्रस्त उल्लेख
नवी दिल्ली : ‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’ असल्याचा उल्लेख राजस्थानमधील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये करण्यात आला आहे. या प्रकारावर सर्वत्र संताप व्यक्त असून अशा महान व्यक्तींविषयी अशा शब्दाचा वापर कसा काय केला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे.
राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख आहे. ‘अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. ‘टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात. ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. दरम्यान, हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावर राजस्थान सरकार कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.