बाबासाहेबांमुळे महिलांना मिळाले समान अधिकार- राष्ट्रपती
पुणे : जगातील अनेक देशांच्या घटनेमध्ये महिलांना समानाधिकार देण्यास वेळ लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रचित राज्यघटनेमध्ये पहिल्यापासून महिलांना मताधिकारासमवेत सगळे समान अधिकार देण्यात आले आहेत,’ असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. रमाई यांच्या जीवनाकडून भारतीय महिलांनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुणे स्टेशनजवळील रमामाई आंबेडकर उद्यानात राष्ट्रपतींच्या हस्ते रमाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या असाधारण जीवनयात्रेत अर्धांगिनीच्या रूपात प्रत्येक पावलावर रमाई यांनी त्यांना ताकद दिली. त्या नऊ वर्षांच्या तर बाबासाहेब १४ वर्षांचे असताना त्यांचा विवाह झाला होता. रमाईंना केवळ ३७ वर्षांचे आयुष्य लाभले. बाबासाहेबांना त्यांच्या महान जीवनयात्रेसाठी पूर्णपणे तयार केल्यानंतरच त्यांनी शेवटचा श्वास घेतला,’ असेही कोविंद यांनी नमूद केले.