बाबरी मशिदीसाठी मोदी पंतप्रधान झालेत का? प्रवीण तोगडिया यांचा सवाल
अहमदाबाद: विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राम मंदिराच्या मागणीसाठी त्यांनी अहमदाबादमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलं असून बाबरी मशीद बांधण्यासाठी नरेंद्र मोदीपंतप्रधान झाले आहेत काय? असा सवाल तोगडिया यांनी केला आहे.
प्रवीण तोगडिया यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अहमदाबादेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला. ‘हिंदुंनी प्राण त्याग केला. रक्त सांडवलं. म्हणून तुम्हाला सत्ता मिळाली आहे. पोलिसांना सांगून ३०० हिंदुंना ठार केलं होतं, हे विसरलात का?,’ असा सवाल तोगडिया यांनी यावेळी केला.
‘आजही गुजरातमधील १२०० हून अधिक हिंदू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. शेकडो हिंदुंचं बलिदान आणि हजारो हिंदुंचा तुरुंगवास तुम्हाला सत्तेत बसविण्याचा मार्ग होता का? ज्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी प्राण दिले, ज्यांनी राम मंदिरासाठी तुरुंगवास भोगला, त्यांच्या बायका आज रडत आहेत, याचं तुम्हाला भान आहे का? असा सवालही त्यांनी केला.
संसदेत बहुमताने निवडून आल्यावर विधेयक पास करून राम मंदिराचा मार्ग मोकळा करू असं संघाने एकदा सांगितलं होतं. आयोध्येत कारसेवा करण्यासाठी बलिदान देण्याचं आवाहन विहिंपने लोकांना केलं होतं. राम मंदिरासाठी ६० लोकांनी बलिदान दिलं होतं. गुजरातमधील हजारो लोकांनी योगदान दिलं होतं, याकडेही त्यांनी मोदी सरकारचं लक्ष वेधलं. सीमेवर सैनिक सुरक्षित नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या मुली आमच्या घरात सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान परदेशवारीवर गेले आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.