#CoronaVirus : बस किंवा ट्रेन बंद नाही,नाईलाज झाल्यास बंद करु- मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत राज्यात जी परिस्थिती आहे, त्यावर चर्चा झाली. “राज्यात एकूण 40 रुग्ण आहे. त्यात एकाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांमध्ये 26 पुरुष आणि 14 महिला आहे. त्यात एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी पुन्हा आवाहन करतो आहे, आज देखील आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, अनावश्यक प्रवास टाळा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला कठोर पाऊले उचलावी लागतील. पण ती कठोर पाऊले उचलायची आमची इच्छा नाही. जनतेनं सहकार्य करावं,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले
“मला खात्री आहे जनतेला या विषयाचं गांभीर्य कळलेलं आहे. जसं पुण्यामध्ये काही लोकांनी स्वत:हून दुकान बंद केली आहेत. मुंबईसह इतर शहरातील दुकानदारांनाही आवाहन करतो आहे की, जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकान चालू ठेवू नये. त्यांनी स्वत:हून ती दुकान बंद केली तर चांगलं होईल,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं
सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी नाही
“मुंबईमध्ये एक जी बातमी फिरते की, सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी दिली आहे. मात्र अशाप्रकारे सरकारी कार्यालयांना सुट्टी दिलेली नाही. पण उपस्थितीबद्दल आम्ही विचार करतो आहोत. 50 टक्के उपस्थिती ठेऊन कामकाज चालू ठेवता येईल का? तोही विचार सुरु आहे. एकूणच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सरकार म्हणून आवश्यक पाऊलं उचलत आहोत,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“पुढचे 15 ते 20 अत्यंत महत्त्वाची आहेत. या महत्त्वाच्या कालावधीत जनतेनं स्वत:हून स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. सर्वांनी जर सहकार्य तर धोका आपण टाळू शकतो,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
..अन्यथा कठोर निर्णय घेऊ
“आजही आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, जनतेने अनावश्यक प्रवास टाळला नाही तर आम्हाला तसे कठोर निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये,” अशीच माझी इच्छा आहे.