बळीराजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देणार विशेष निधी – शरद पवार
महाईन्यूज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष निधी जमा केलेला आहे. जवळपास ८० लाखांचा निधीचा धनादेश आज शरद पवारांना सोपविण्यात आला आहे. या निधीचा वापर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वापरावा अशी सूचना शरद पवारांनी नेत्यांना केली आहे.यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ८० लाखांचा धनादेश दिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पैसे जमा केले. राष्ट्रवादी पक्षाचा वेलफेअर ट्रस्ट आहे. ज्या कुटुंबाच्या प्रमुखाने शेतीच्या समस्येमुळे आत्महत्या केली आहे त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरावी, ही रक्कम फिक्स डिपोझिट ठेऊन, १ लाखांपैकी ५० हजार रक्कम बॅंकेत ठेवायची आणि त्या व्याजातून शिक्षण द्यायचं आहे. उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सावरण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी शरद पवारांबद्दल भाषण केलं. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, साहेब नेहमीच आपल्या सहकार्यांच्या पाठिशी उभे राहतात. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी सर्वतोपरी मदत केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, भुजबळ आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाहीये. सर्व काही संपलं असं वाटत होतं तेव्हा साहेबांनी पुनर्जन्म दिला अस वाटल. शरद पवारांची प्रतिभा आणि कार्य प्रचंड मोठे आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच साहेबांचा गौरव केला. वाजपेयी साहेब म्हणायचे की पवार साहब इतने आगे है क्यूंकी उनके साथ प्रतिभा आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत जो प्रश्न आपल्याला समजतही नाही त्या प्रश्नाची सोडवणूक करून शरद पवार मोकळे झालेले असतात. लातूर भूकंप, भूज भूकंप या आपत्तींमध्ये साहेबांनी संवेदनशील परिस्थिती योग्यरित्या हातळली. मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी काही तासात मुंबईत पूर्ववत केली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला जर कोणता उत्कृष्ट मुख्यमंत्री लाभला असेल तर ते म्हणजे शरद पवार. आज ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जी वास्तू उभी आहे त्याची पायाभरणी साहेबांनी केली आहे. सर्वच क्षेत्रात साहेबांनी आपला ठसा उमटवलाय असंही छगन भुजबळांनी सांगितले.