बलात्काराच्या घटनांमध्ये सांप्रदायिकता आणणे दु:खद – स्वाती मालीवाल
नवी दिल्ली – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात बलात्कारांना आळा घालण्यासाठी उपायांबरोबरच बलात्कारांच्या घटनांत सांप्रदायिकता आणण्याच्या प्रकाराबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
बलात्काराच्या प्रकरणांच्या त्वरित निकालांसाठी पुढील तीन महिन्यात अतिरिक्त पोलीसबळ तैनात करणे आणि द्रुतगती न्यायालयांसाठी 15 दिवसांत विशेष समिती स्थापन करण्याबाबत त्यांनी लिहिले आहे. पूर्वी बलात्काराच्या घटनांना सांप्रदायिक रंग देण्याचे प्रकार दुर्मिळ होते. मात्र आता अचानक पीडितेचा धर्म महत्त्वाचा बनला आहे, ही मोठी दु:खाची गोष्ट असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.
12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणारांना फाशीची शिक्षा देण्यास न्यायालयांना परवानगी देणारा अध्यादेश काढल्याबद्दल राष्ट्रपतींना धन्यवाद दिले आहेत. मात्र जोपर्यंत अशा प्रकरणांचा सहा महिन्यात निकाल लागत नाही, तोपर्यंत या अध्यादेशाचा परिणाम दिसून येणार नाही, आणि परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही, असे त्यानी म्हटले आहे.
राजघाटावर 22 एप्रिलपर्यंत उपोषणास बसलेल्या स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपतींनी 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेस मंजुरी देणाऱ्या अध्यादेशावर सही केल्यानंतरच उपोषण सोडले होते. मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कायम ठेवले जावेत आणि केंद्र, राज्य आणि न्यायपालिकांचे प्रतिनिधी असलेली विशेष समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांने पंतप्रधानांकडे केली आहे.