बकालपणा: संत तुकारामनगरात राजकीय “टपरी वॉर”
- हातगाडी, टपरीवाल्यांना राजकीय पाठबळ
- पालिका प्रशासनाकडून कारवाईस दुजाभाव
पिंपरी – संत तुकारामनगरमधील टप-यांवर कारवाई केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत त्या 90 टप-या पुन्हा थाटण्यात आल्या. एका टपरी बनविणा-या व्यक्तीचा जीव गेलेला असताना देखील येथील टप-या राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे संत तुकारामनगरचे नामकरण करून “टपरीनगर” असे संबोधण्यात यावे, अशी सूचना स्थानिक नगरसेविका सुजाता पालांडे यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. येथील अन्य काहींचे पाठबळ असल्यामुळेच पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास कचरत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे एकीकडे स्मार्ट सिटीचा गवगवा होत असतानाच दुसरीकडे मात्र, संत तुकारामनगरचा बकालपणा वाढत चालल्याची वस्तुस्थिती आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील हातगाडी, टप-यांचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. हॉकर्स झोन नसल्यामुळे शहरातील हातावर पोट घेऊन व्यवसाय करणा-या हातगाड्या व टप-या काही चौकांमध्ये लावलेल्या आहेत. त्यातील काही टप-या व हातगाड्यांची पालिकेकडे नोंद आहे. तरीही, अशांना दंड ठोठावला जात आहे. शहराच्या बहुतांश भागात राजकीय व्यक्तींच्या आशिर्वादाने हातगाड्या व टप-या राजरोसपणे चालतात. अशांना सोडून अधिकारी निष्पाप लोकांवर कारवाई करत आहेत. एखाद्या भागात कारवाईचे नियोजन असल्यास त्या भागातील राजकीय व्यक्तींना पूर्वकल्पना देऊन कारवाई केली जाते. कायद्याचे उल्लंघन करून कारवाईचा अट्टाहास केला जात आहे. त्यामुळे कष्टकरी कामगार पंचायतीने व्यवसायिकांची बाजु घेऊन प्रशासनाच्या जुलमी कारवाईबाबत महापालिकेवर आंदोलन केले होते. फेरीवाला महासंघानेही पालिकेवर बुधवारी (दि. 12) आंदोलन केले. मागच्या सर्वसाधारण सभेत हातगाडी, टपरी वाल्यांसाठीचे शूल्क आणि तत्सम धोरण तयार करण्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.
संत तुकारामनगरमध्ये 465 याहून अधिक टप-या आहेत. मात्र, बायोमेट्रीक सर्व्हेनुसार याठिकाणी केवळ 90 टप-या असल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. चौपाटीवरील टप-यांच्या नोंदीबाबत साशंकता आहे. येथील टप-यांमुळे तीन जणांचे बळी गेले आहेत. मध्यंतरी टपरी बनविणा-या व्यक्तीचा हाकनाक बळी गेला. त्यावर प्रशासनाने येथील टप-यांवर कारवाई केली. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच जैसे थे परिस्थिती झाली. हटविलेल्या सर्व टप-या पुन्हा थाटण्यात आल्या. एकेकाच्या सात-सात टप-या आहेत. घरी बसून खंडणी उकळण्याचे प्रकार येथील गुंडाकडून सुरू आहेत. आम्ही तक्रार केल्यानंतर प्रशासनाने 70 टप-या काढल्या. त्यामुळे आमचे नाव खोट्या प्रकरणात गोवून गुन्हे दाखल करण्यात आले. या टप-यांना नेमके कोणाचे समर्थन आहे. पालिकेचे अधिकारी कारवाई करण्यास का भितात?, आणि कारवाई केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत येथील टप-या कोणाच्या जीवावर थाटल्या जातात?. याची चौकशी केली जावी?, अशी मागणी नगरसेविका सुजाता पालांडे यांनी सभागृहात केली होती. तरीही, पालिका प्रशासन अजुनही ढिम्मच आहे. त्यामुळे संत तुकारामनगरचा बकालपणा वाढत चालला आहे.
गुंडगिरी, भाईगिरी अन् दादागिरी वाढली
एखादी टपरी लावयची असल्यास अधिकारी त्या भागातील नगरसेवकाचे पत्र घेऊन येण्यास संबंधित व्यक्तीला सांगतात. नगरसेवकाने पत्र दिल्यानंतर अधिकारी टपरी लावण्याचा परवाना देतात. टपरी लावण्यासाठी नगरसेवकांच्या पत्राची काय गरज आहे?. एखाद्या नगरसेवकाने परवाना देण्यास नकार दिल्यास, त्याचे नाव खोट्या गुन्हात घेऊन त्याला गळाला लावले जाते. अधिका-यांच्या समर्थनामुळे संत तुकारामनगर भागात गुंडगिरी, भाईगिरी, दादागिरी वाढली आहे. याला पायबंद घालण्याची गरज आहे, अशी सूचना पालांडे यांनी प्रशासनाला केली होती. ————–