‘फोन टॅप होत असल्याची माहिती भाजपच्याच मंत्र्याने दिली होती’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबई | राज्यात सध्या फोन टॅपिंगचे प्रकरण चांगलेच वाढले आहे. सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विरोधकांची फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. फोन टॅप होत असल्याची माहिती मला एका भाजप नेत्यानेच दिली, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.
फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेकांचे फोन टॅप झाल्याचा आरोप आहे.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, फोन टॅपिंगची माहिती मला एका भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्यानेच दिली होती. त्यावेळी माझे बोलणे कुणाला ऐकायचे असेल तर, त्याचे स्वागतच करतो. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपूनछपून करत नाही. माझे बोलणे ऐकाच, असे मी त्यांना म्हणालो होतो. असा दावा संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केला आहे.
फडणवीस सरकार असताना, विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. त्यामुळे गृह खात्याने सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचे ठरविल्याचे समजते.