प्रांतवादातून आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांकडून पाच तरुणांची निर्घृण हत्या
आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांनी शांतता भंग करण्याचे कृत्य केले असून पाच तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त आहे. तिनसुकीया जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली.
हे पाचही तरुण एका दुकानात बसले होते. त्याचवेळी उल्फाचे काही अतिरेकी तिथे आले आणि त्यांनी या तरुणांना ते ब्रह्मपुत्र नदीच्या किनारी घेऊन गेले. तिथे त्यांना रांगेत उभे करुन त्यांची एकामागून एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला.
दरम्यान, या प्रकरणावरुन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ही घटना प्रांतवादातून झाल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारने आसाममध्ये केलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी अभियानामुळे (एनआरसी) ही घटना घडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.