पोलिसांना मोठे यश: छत्तीसगडमध्ये ६२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील नारायणपूर येथे ६२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. बस्तरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि नारायणपूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यांनी ५१ देशी शस्त्रास्त्रे पोलिसांकडे सोपवले. छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. विधानसभा निवडणुकांच्या आधी पोलिसांना मिळालेले हे मोठे यश आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून नक्षलवाद्यांच्या हालचाली तीव्र झाल्या होत्या.
दरम्यान, पोलीस उपमहानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरनपूर येथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात आमचे दोन जवान शहीद झाले. तर हल्ल्यात जखमी झालेल्या दूरदर्शनच्या कॅमेरामनने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाले होते.
राज्यातील नक्षलप्रभावित विजापूर जिल्ह्यातील आवापल्ली येथे नक्षलवाद्यांनी २७ ऑक्टोबरला बुलेट प्रुफ बंकर सुरंगाने उडवले होते. या घटनेत सीआरपीएफच्या १६८ बटालियनचे चार जवान शहीद झाले होते. तर २९ तारखेला नक्षलवाद्यांनी दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावातील जिल्हा पंचायत सदस्य तसेच भाजपा नेते नंदलाल मुड्यामी गंभीर जखमी झाले होते.
गेल्या महिन्यात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येत्या दोन ते तीन वर्षांत देशातील नक्षलवाद संपुष्टात येईल, असे वक्तव्य केले होते. पूर्वी नक्षलवाद १२६ जिल्ह्यात होता. तो आता १०-१२ जिल्ह्यापुरता मर्यदित राहिल्याचे ते म्हणाले होते.