पोटनिवडणुकांतील मतदानात इव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड
- निवडणूक आयोग म्हणते, वाढत्या उष्णतेचा परिणाम
नवी दिल्ली – देशाच्या अनेक भागात आज लोकसभा तसेच विधानसभेच्या पोट निवडणुका होत आहेत. त्याची मतदान प्रकिया सुरू असताना इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या किंवा त्या नादुरूस्त झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तथापी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील उष्णतेच्या लाटेचा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे असे झाले असावे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे तर अन्य राजकीय पक्षांनी हा ईव्हीएममध्ये घोटाळा करण्याचाच एक डाव आहे असा आरोप केला आहे.
भंडारा- गोंदीया मतदार संघातील 35 मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे तेथील मतदान प्रकिया निवडणूक आयोगाने रद्द केल्याची अफवा पसरली होती. पण निवडणूक आयोगाने त्याचा इन्कार केला आहे. तेथील मतदान प्रकिया तात्पुरती थांबवण्यात आली होती पण नंतर ती चालू करण्यात आल्याचे तेथील निवडणूक आधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तरप्रदेशातील कैराना लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तब्बसुम हसन यांनी दीडशे मतदान यंत्रे बिघडल्याची लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे दिली.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. उष्णतेचा मतदार यंत्रांवर विपरीत परिणाम होतो असे म्हणणे धक्कादायक आहे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की विदर्भात दर एप्रिल मे महिन्यात तापमान 45 अंशावर जाते याचा अर्थ आता यापुढे उन्हाळ्यात निवडणुकाच घ्यायच्या नाहींत काय असा सवाल त्यांनी केला.