पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपाची पळवापळवी – अशोक चव्हाण
मुंबई – पालघर पोटनिवडणूकीत भाजपाने कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिल्याबद्दल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आगपाखड केली आहे. भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळवला म्हणून भाजपने गावितांना पळवले. पक्षनिष्ठा नावाचा प्रकार राहिला नसून भाजप पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी करित असल्याचा आरोप करतानाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष अशा वल्गना करणाऱ्या भाजपला स्वतःचा एक उमेदवारही मिळू नये हे लांछनास्पद आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.
राजेंद्र गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पाश्वभूमिवर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. राजेंद्र गावीत यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून गावीत हे भाजपच्या संपर्कात होते. म्हणजे त्यांनी कॉंग्रेस पक्षात राहून पक्षाशी गद्दारी केली आहे. पालघर लोकसभा मतदार संघातील जनता गद्दारांना धडा शिकवेल, असा संताप चव्हाण यांनी व्यक्त केला.
राजेंद्र गावित दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना मिळणार नाही याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. अशा पडेल उमेदवाराला घेऊन भापजने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने माजी खासदार दामू शिंगडा यांची पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार म्हणून अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीकडे शिफारस केली आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.