पेन्शनसाठी आईचा मृतदेह चार महिने घरातच ठेवला!
- वाराणसी येथील घटना
वाराणसी – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबाने पेन्शनसाठी चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या 70 वर्षीय आईवर अंत्यसंस्कार केले नाहीत. मुलांनी महिलेच्या मृतदेहावर केमिकल लावून ते सुरक्षित ठेवले होते, जेणेकरुन शरीर खराब होणार नाही आणि दुर्गंध पसरणार नाही.
ही घटना वाराणसीजवळच्या भेलुपूर इथल्या कबीरनगरमध्ये घडली आहे. अमरावती असे मृत महिलेचे नाव असून तिचे 13 जानेवारी 2018 रोजी निधन झाले होते. पोलिसांनी घरावर छापा मारून ही घटना उघडकीस आणली.
अमरावती यांचे पती दया प्रसाद यांचे निधन 2000मध्ये झाले होते. त्यानंतर अमरावती यांना दरमहा 40 हजार रुपये पेन्शन मिळत होती. या पेन्शनच्या लालसेपोटी महिलेच्या मुलांनी तिच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह घरातच ठेवला. तसेच मृतदेह सुरक्षित राहण्यासाठी केमिकलचा वापर करत दर महिन्याला पेन्शन घेत होते.
दरम्यान, बरेच दिवस सदर महिला नजरेस येत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. शिवाय आरोपी कोणालाही आपल्या घरी येऊ देत नव्हते. त्यामुळे कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कुटुंबाच्या घरावर छापा मारला असता महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घर सील केले असून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला.
मृत महिलेच्या कुटुंबात पाच मुले आणि तीन मुली आहे. त्यापैकी दोन मुलांची आणि मुलींची लग्न झाली आहेत. पाचही मुले बेरोजगार असून महिलेला मिळत असलेल्या पेन्शनवर जगत होते. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी हाताच्या अंगठ्यावर शाईचे डाग होते. यावरुन हे कुटुंब महिलेच्या मृतदेहाचा अंगठा लावून पेन्शन घेत असल्याचे स्पष्ट होते.