पुलवामा हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल : सपा नेता
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर उत्तर प्रदेशातील समाजवादी नेते आर. जी. यादव यांनी मोठे भाष्य केले आहे. या हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
यादव म्हणाले, मतांसाठी पुलवामात जवानांवर हल्ला घडवून आणण्यात आला, त्यामुळे अर्धसैनिक दले सरकारवर नाराज आहेत. जवानांना घेऊन इतका मोठा ताफा महामार्गावरुन जात असताना जम्मू-श्रीनगर दरम्यान तपासणी झाली नाही. तसेच या जवानांना साध्या बस मधून रवाना केले जात होते. त्यामुळे हा सगळा कट होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, या कटात कोण सामिल होतं हे मी आत्ता सांगू इच्छित नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर याची जेव्हा चौकशी होईल तेव्हा बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असे यादव यांनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याने या विधानावर सत्ताधाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.