पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा; अमित बच्छाव यांची मागणी
पिंपरी – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा झपाटय़ाने विकास होत आहे. शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब असल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या वेगाने वाढू लागली आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था हा विषय ऐरणीवर आला आहे. ही परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे याठिकाणी होण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरात किरकोळ कारणांवरून तलवार, चॉपर हल्ल्यांसारख्या घटना घडत आहेत. तसेच हाणामा-या, खुन, बलात्कार, विनयभंग अशा घटना सर्रासपणे घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हे घडण्याचे प्रमाण व गुन्हे नोंदवले जाण्याचे प्रमाण न्यायालयात शिक्षा होण्याच्या प्रमाणाशी निगडीत असते. हे प्रमाण येथे फार कमी झाले आहे. गुन्हे घडण्याचे प्रमाण आणि शिक्षा होण्याचे प्रमाण हे बिहार, उत्तरप्रदेश व राजस्थानपेक्षा कमी झाले असले तरीही एका बाजूला बिहारमधील कायदा व्यवस्था सुधारत असल्याच्या बातम्या येत आहेत. तर, दुसर्या बाजूला महाराष्ट्रासारख्या प्रथमपासून आघाडीवर असलेल्या राज्यात गुन्हेगार मोकाट राहात असल्याची वस्तुस्थिती होत आहे.
पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची कार्यवाही करण्यात येते. गुन्हेगार कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रकार पहावयास मिळतात आहे. हि सारी परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून शहराला हे भुषणावह नाही. त्या अनुषंगाने या सार्या पार्श्वभूमीवर पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अती महत्वाचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे बच्छाव यांनी म्हटले आहे.