पुण्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा, गणेशोत्सवापर्यंत पाणी कपात नाही : महापौर
पुणे : “गणेशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात केली जाणार नाही,” असा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (4 ऑगस्ट) महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यात पाणी कपात केली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत पालिकेतील बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ, पालिका आयुक्त आणि जलसिंचन विभागाच्या अधिकारी उपस्थितीत होते. या बैठकीत पुण्यात नेमका किती टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. पुणे जिल्ह्याला पाणी किती द्यायचे आहे, तसेच नेमकं पिण्यासाठी किती पाणी उपलब्ध आहे, याबाबत चर्चा झाली.
“पुणे शहराला टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्यावर्षी आजच्या तारखेला या धरणात जवळपास 97 टक्के म्हणजेच 28 टीएमसी एवढा पाणीसाठा होता. मात्र यंदा पुणे, मुंबईत पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या धरणात 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 ऑगस्टपर्यंत शहरात तसेच जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुण्यात जवळपास 104 टक्के पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता गणोशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात नाही, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले.