पुण्यातील चार धरणात अवघा ३३ टक्के पाणीसाठा
पुणे – यंदा पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट कायम आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा ६.८८ टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचे संकट आले आहे. धरण प्रकल्पातील चारही धरणात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. हा साठा अवघा ३३ टक्के इतका आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने १२ दिवसांमध्ये धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी कमीच आहे.
असे असले तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळू शकते. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या ४ धरणातून शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. तर दौंड, इंदापूर आणि बारामतीला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. अशा स्थितीत पाणी कमी असल्यामुळे खरीप हंगामासाठी या पाणी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडता आले नाही.
गेल्यावर्षी ४ धरणांमध्ये एकूण १६.७४ टीएमसी म्हणजेच ५७.४३ टक्के पाणीसाठा होता. सद्य परिस्थितीत चारही धरणातील पाणीसाठा ९.८६ टीएमसी म्हणजेच ३३.८२ टक्के आहे. खडकवासला ४१.०१ टक्के, पानशेत ३९.९५ टक्के, वरसगाव ३१.७७ टक्के आणि टेमघरमध्ये १९.४४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट आहे. मात्र हा निर्णय ऑगस्टमध्ये किती पाऊस होतो यावरच ठरणार आहे.