पुणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे महापौरांना संताप
- च-होलीत भामा आसखेड जलवाहिनीचे काम रखडले
- स्थानिक शेतकरी व नागरिकांना होतोय त्रास
- उद्या बैठकीत देणार सक्त सूचना
पिंपरी – भविष्यात निर्माण होणा-या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भामा आसखेड धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील च-होली भागातून जलवाहिनी भूमिगत केली जात आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे येथील स्थानिक शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत. हे काम पुणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे रखडल्याचा आरोप करत महापौर नितीन काळजे यांनी गुरुवारी (दि.24) पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची संयुक्त बैठक बोलाविली आहे.
पुणे शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन भामा-आसखेड धरणातून 2.64 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मंजूर झालेले आहे. हे पाणी धरणातून शहरात आणण्यासाठी 1600 मीटर व्यासाची 42 किलोमीटर लांब जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या मार्गात भामा आसखेड धरणातून खेड तालुक्यातील आंळदी, च-होली मार्गे ही जलवाहिनी लोहगावजवळ पुणे महापालिकेच्या हद्दीत जाणार आहे. ही जलवाहिनी टाकण्याचे मागील दोन वर्षांपासून आळंदी, च-होली परिसरात सुरू आहे. ठेकेदाराने जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहे. हे काम जलदपणे केले जात नाही. त्याचा त्रास या भागातील स्थानिक शेतकरी व नागरिकांना होत आहे.
त्यांच्याकडून ओरड सुरू असून वारंवार तक्रारी करूनही पुणे महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. ठेकेदार काम करत असताना पुणे महापालिका प्रशासन कामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास आपल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी महापालिकेच्या संबधित अधिका-यांची गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आयुक्त दालनात बैठक बोलाविण्यात आली आहे. हे काम रखडल्याचा जाब विचारून त्याला गती देण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले आहे.