“पीएमएसबीवाय’अंतर्गत महाराष्ट्रात 45 हजार विमाधारक
नवी दिल्ली – देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित 16 हजार 850 खेड्यांमध्ये 26,11,787 विमाधारकांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील उद्दिष्टित 192 खेड्यांमध्ये 45,115 विमा धारकांची नोंद झाली आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने देशातील गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल मानल्या जाणारी “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ 1 जून 2015 पासून सुरु करण्यात आली. योजनेनुसार वार्षिक 12 रूपये इतका प्रीमिअम असून अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबियांस 2 लाख रूपये किंवा अपघातात दुखापत झाल्यास उपचारासाठी 1 लाख रूपये देण्यात येतात. बॅंक खाते असणारी 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती या योजनेस पात्र ठरते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने या योजनेची अंमलबजाणी सुरु असून मागास खेड्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
आजपर्यंत देशभरातील उद्दिष्टित 27 राज्य व केंद्र शासित प्रदेशातील 16 हजार 850 खेडयांमधे या योजनेच्या माध्यमातून 26 लाख 11 हजार 787 लोकांचा विमा उतरविण्यात आला आहे.
ही योजना राबविण्यासाठी राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांतील 192 खेड्यांची निवड करण्यात आली. यानुसार विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यांतील 140 खेड्यातील 32 हजार 668 लोकांचा विमा उतरविण्यात आला. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातून 6,992, पश्चिम महाराष्ट्रातून 2097 लोकांना आणि खान्देशातून 3,358 जणांना विमा सुरक्षा देण्यात आली आहे.