पिंपरी चिंचवडमध्ये डेंगीचे थैमान ; 103 रुग्णांना लागण, 1261 रुग्ण संशयित आढळले
अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिका-यांचे दुर्लक्ष
डेंगीने रुग्ण दगावल्याने आज (बुधवारी) घेतली तातडीने बैठक
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. शहरात मलेरिया, स्वाईन फ्लू, डेंगी, चिकनगुनिया, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. महापालिका व खासगी रुग्णालयात रुग्णांची तुड़ुंब गर्दी पाहायला मिळत आहे. साथीच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होवू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. याकडे पालिकेच्या अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिका-याने दुर्लक्ष केल्याने साथीचे आजार अनेकांच्या जीवावर बेताले जावू लागले आहे.
पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. स्वाइन फ्लूसारख्या आजाराने डोके वर काढून तब्बल 24 रुग्ण दगावले आहेत. स्वाइन फ्लू व डेंगी यांचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्याची लागण गर्भवती स्त्रिया व लहान मुले, तसेच वयोवृद्ध व हृदयरोग असणाऱ्या लोकांना जीवघेणी ठरत आहे. त्यांना योग्य उपचार, तसेच टॅमी फ्लूच्या गोळ्या या वेळेत चालू होणे महत्त्वाचे आहे.
शहरात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत २3 रुग्णांना मलेरियाची लागण झाली आहे. तर जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक ८ रुग्णांना मलेरियाची लागण झाली होती. शहरात तापांचे (फेवर) असलेले 60 हजार 620 रुग्ण, डेंगीचे लागण झालेले 103 रुग्ण तर संशयित 1 हजार 261 रुग्ण आहेत. मात्र, चिंकनगुनियाचे 8 रुग्ण आढळून आलेले आहेत.
दरम्यान, शहरात साथीचे आजाराने थैमान घातले असताना पालिका आरोग्य वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिका-याचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी केवळ महापालिका वायसीएम रुग्णालयातील प्रस्तावित महाविद्यालयाच्या खरेदीकडे लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. परंतू, शहरातील नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
प्लाझमोडियम या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाला थंडी वाजते. थंडीचा कालावधी पंधरा मिनिटे ते तासभर असतो. दुपारनंतर ताप येतो व घाम येऊन तो कमी होतो. त्याबरोबरच डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी अशी लक्षणे जाणवतात.
मलेरिया या आजाराची नुकतीच लागण झाली असेल तर ही लक्षणे सौम्य असतात. त्यामध्ये सुरुवातीस फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. रक्तनमुना तपासल्याशिवाय मलेरिया या आजाराची लागण झाली आहे की नाही याचा निर्णय घेणे अवघड असते. त्यामुळे लक्षणे वाटल्यास रक्त चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्लाझमोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जाण्याची व दगवण्याची शक्यता असते. काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात. या गंभीर आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णांला त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते.
शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे जनजागृती सुरू आहे. ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती दिली जात आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या आजारावर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत़. मात्र याकडे दुर्लक्ष केले तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांवर उपचार केला जातो. थंडीताप आल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे.
डाॅ. पवन साळवे – अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी