breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पालकमंत्र्यांना पिंपरी-चिंचवड शहराची अॅलर्जी आहे का ? – संजोग वाघेरे
भाजपने निवडणुकीतील एकही आश्वासन पूर्ण केले नाही
पिंपरी – भाजपाने महापालिकेत सत्तेत येण्यापूर्वी शहरवासियांना विविध आश्वासने दिली होती. शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, बोपखेल, संरक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडू अशा वल्गना केल्या होत्या. महिन्यातून एखदा शहरात येऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार असे सांगितले होते. तथापि, वर्षभराच्या राजवटीत पालकमंत्र्यांनी शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. एकही प्रश्न मार्गी लागला नाही. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी बापटांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते हजर राहात नाहीत. त्यामुळे बापटांना पिंपरी-चिंचवडची अॅलर्जी आहे का? , असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाघेरे यांनी म्हटले की, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरातील जनतेला विविध आश्वासने दिली. शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, बोपलखेल पूल, संरक्षण खात्यासंदर्भातली सर्व प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. प्रत्यक्षात एकही प्रश्न सुटला नाही. शास्तीकरामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. बोलखेलच्या पुलाचा प्रश्न रखडला आहे. पवना, इंद्रायणी या नद्या गटारगंगा झाल्या आहेत. नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. यामुळे डासांची उत्पती वाढली असून नागरिक त्रस्त आहे. शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर आहे. विविध समस्यांनी शहरवासीय त्रस्त आहेत. परंतु, शहराच्या प्रश्नांकडे सत्ताधा-यांचे लक्ष नाही.
पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्थानिक पदाधिका-यांमध्ये एकमत नाही. पदाधिकारी कच-यात गुरफटले आहेत. कच-याच्या किती निविदा काढाव्यात अन् किती नाही याबाबतच त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे लक्ष नसल्यामुळे पदाधिका-यांचा चुकीचा कारभार सुसाट सुरु आहे. त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट शहरात फिरकत नाहीत. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी बापटांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते हजर राहात नाहीत. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत, झाल्यास त्याचा अपेक्षित पाठपुरावा होत नाही, असेही वाघेरे म्हणाले.
माजी उपमुख्यमंत्री व पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार पालकमंत्री असताना महिन्यातून एक ते दोनदा शहरात यायचे. शहरातील प्रश्न सोडवयाचे. शहरातील झाडाची फांदी तुटली असली तरी ते अधिका-यांना सांगून ते काम करुन घ्यायचे. त्यांचे शहरावर अत्यंत बारीक लक्ष होते. त्यामुळेच शहराचा सर्वांगणी विकास झाला आहे. त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने शहराचा विकास केला आहे. परंतु, आता भाजपच्या राजवटीत पालकमंत्र्यांचे शहराकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असेही वाघेरे म्हणाले.