पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पण नियोजनाचा अभावामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करुन दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करु, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे. तसेच आयुक्तांना दुषित पाण्याची बाटली भेट देण्यात आली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका सुलभा उबाळे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डिकर यांना भेटून निवेदन दिले.
महापालिका पाणीपुरवठा विभागाने 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. नागरिकांना समन्यायी पाणीवाटपाचे कारण देवून दोन महिन्यासाठा हा निर्णय घेतला आहे. परंतू, शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कमी दाबाने आणि दुषित पाणी येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (शनिवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची चिंचवड, अॅटो क्लस्टर येथे भेट घेतली. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली.
माजी खासदार आढळराव म्हणाले, ”प्रशासन आणि आयुक्त पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत. आजपर्यंत उन्हाळ्यात सुद्धा कधीच पाणीटंचाई जाणवली नाही. आता हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नागरिकांचा उद्रेक होईल. आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या उपस्थित पाणीकपाताची निर्णय घेतला आहे. पाणीकपात मागे घेण्यासाठी गटनेत्यांच्या मान्यतेची गरज नाही. त्यामुळे तत्काळ पाणीकपात मागे घेऊन शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा सुरु करावा”. असेही ते म्हणाले.