पाकिस्तानला धडा शिकवलेला दिवस; धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने घडवली होती अद्दल, १५ वर्षांपूर्वी झालेल्या एका लढतीच्या आठवणी ताज्या
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
टी-२० वर्ल्डकपला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. अशात २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. १४ सप्टेंबर ही तारीख भारतीय चाहत्यांसाठी खास आहे. याच दिवशी २००७ साली भारतीय संघाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला अशी अद्दल घडवली होती जे ते कधीच विसरणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या लढतीत टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला होता. तेव्हा टीम इंडियाने पाकिस्तानचा बॉल आउटमध्ये पराभव केला होता.
२००७ साली पहिल्या टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. भारताची पहिली मॅच पाकिस्तानविरुद्ध होती. धोनी प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करत होता. अशात समोर पाकिस्तान सारखा कट्टर प्रतिस्पर्धी होता. दोन्ही संघातील ही मॅच टाय झाली आणि तेव्हाच्या नियमानुसार मॅचचा निकाल बॉल आउटद्वारे करण्याचा निर्णय झाला.
भारताने प्रथम फलंदाजी करत १४१ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल पाकिस्तानने देखील तितक्याच धावा केल्या. त्यानंतर झालेल्या बॉलआउटमध्ये भारताने ३-० असा विजय मिळवला. भारताकडून हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पा यांनी बरोबर विकेटवर चेंडू मारला. तर पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदी, उमर गुल आणि यासिर अराफात यांना एकही चेंडू विकेटवर हिट करता आला नाही.