पाकिस्तानकडून हवाईक्षेत्र खुले
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने बंद केलेले हवाईक्षेत्र पुन्हा खुले करण्यात आले असून मंगळवारपासून भारत-पाकिस्तान दरम्यान हवाई वाहतूक सेवा पूर्ववत झाली. नागरी विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र साडेचार महिन्यांनी खुले झाले आहे.
पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे, की पहाटे १२.४१ वाजेपासून हवाई क्षेत्र नागरी विमानांसाठी खुले करण्यात येत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या मार्गावर ही वाहतूक खुली करण्यात आली आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर भारतानेही आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे.
सरकारी सूत्रांनी सांगितले, की पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर आता भारतानेही आपले हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी पाकिस्तानला खुले केले आहे. बंद असलेले हवाई मार्ग वापरण्याची परवानगी मिळताच विमान कंपन्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पाकिस्तानने सर्व विमान कंपन्यांच्या विमानांना पहाटे १२.४१ पासून परवानगी दिल्याने आता नवीन मार्ग वापरण्यास सुरुवात झाली. पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर त्यांच्या देशातून जाणारे हवाई मार्ग भारताला बंद केले होते. त्यानंतरच्या काळात एकूण ११ मार्गापैकी दक्षिण पाकिस्तानातून जाणारे दोन मार्ग खुले करण्यात आले होते. पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याने इंडिगो कंपनीला दिल्ली-इस्तम्बूल थेट सेवा सुरू करता आली नव्हती. त्यांना ही सेवा कतारमधील दोहा येथे इंधन भरून लांबच्या मार्गाने द्यावी लागत होती.
पाकिस्तानचे हवाई वाहतूक सचिव शाहरूख नुसरत यांनी यापूर्वी असे म्हटले होते, की भारताने हवाई हद्द खुली केल्याशिवाय पाकिस्तानही हवाई वाहतूक बंदी मागे घेणार नाही.