पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, रहिवाशी ठिकाणांवरही गोळीबार
भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन गेले जात आहे. आता तर पाकिस्तानकडून सीमेवरील नागरी वस्त्यांवरही गोळीबार केला जात आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. येथील रहिवाशांच्या घरांना देखील पाकिस्तानी सैन्यांनी लक्ष्य केले आहे.
भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानच्या गोळीबारास चोख प्रतित्युत्तर दिले जात आहे. जवानांच्या गोळीबारात पाकिस्तानच्या काही चौक्या देखील उद्धवस्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय सीमेवर गोळीबार सुरूच आहे.
पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या सततच्या गोळीबारामुळे येथील नागिरकांमध्ये एक प्रकारे दहशतीचे वातावरण आहे. या बद्दल हिरानगर सेक्टर येथील स्थानिक नागिराकांचे म्हणने आहे की, पाकिस्तानी सैन्याकडून केल्या जाणाऱ्या सततच्या गोळीबारामुळे आम्ही कायम दहशतीत राहतो. प्रत्येक क्षणी आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही धडपडत असतो. एक सर्वसाधारण आयुष्य जगणं आम्हाला अशक्य झालं आहे. शिवाय, स्थानिक प्रशासनाकडूनही आम्हाला कोणतीही मदत मिळली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानकडून बुधवारी रात्री उशीरा एलओसीसह हिरानगर सेक्टर व पुंछच्या शाहपुरी – किरनी सेक्टरला लक्ष्य करत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारता एक बीएसएफचा जवान व एक नागरिक जखमी झाला आहे.