पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी, ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यात चर्चा
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली असून येथे सत्ता आणण्यासाठी भाजपकडून आतापासूनच जोरदार तयारी करण्यात आली आहे. पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सातत्याने राज्याचा दौरा करत आहेत. या सर्व रणधुमाळीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधातील देशभरातील पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात जानेवारीत कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी करत आहेत. यासंदर्भात त्यांनी देशभरातील भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.
पश्चिम बंगालमधील सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र भाजप रचत असल्याचा आरोप, नवाब मलिक यांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची त्यांनी माहिती दिली. निश्चित रुपाने हा विषय गंभीर असल्याने, देशातील अन्य नेत्यांबरोबर देखील शरद पवार यांची चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतही बैठक होऊ शकते. गरज पडल्यास शरद पवार हे स्वत: पश्चिम बंगालला जातील व विरोधकांना एकत्र करण्याचे काम करतील.
केंद्र सरकारचा वापर करून राजकीय फायद्या घेण्याचं काम भाजपाकडून बंगालमध्ये सुरू झालेलं आहे. निवडून आलेलं सरकार पाडणं हा योग्य कार्यक्रम नाही, लोकशाहीला धरून नाही, अशी टीका देखील मलिक यांनी भाजपवर केली.