पवना धरणातून 1500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु
पिंपरी- पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 1500 क्यूसेक या वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते.
दरवर्षी पवना धरण 15 ऑगस्ट दरम्यान 100 टक्के भरते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे धरण भरायला थोडा विलंब लागला होता. धरण 100 टक्के भरले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. एक जूनपासून 2265 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 2362 मिमी पाऊस झाला होता. धरणात 241 दक्षलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
धरण 100 टक्के भरल्यामुळे दोन दिवसांपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळपासून 1500 क्यूसेक या वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे, अशी माहिती शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी दिली.