परदेशी वावटळामध्ये भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे – ऍड. उज्ज्वल निकम
पुणे – भारतीय संस्कृतीमध्ये परदेशी वावटळ येऊ लागले आहेत. त्यामुळे जन्म दिलेल्या आई-वडीलांना मुले वृद्धाश्रमात राहायला भाग पाडतात. तेव्हा आपली संस्कृती लयाला जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे, असे मत विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘लक्ष्मी-वासुदेव विधिभूषण पुरस्कार’ ऍड. निकम यांना शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी निकम कुठुंबीय उपस्थित होते. यानिमित्त गुरुदेव शंकर अभ्यंकर लिखित शंकर रामायण(बालकाण्ड) या ग्रंथाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. ऍड. निकम म्हणाले, मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. परंतु आई-वडीलांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडीलांचे व ज्येष्ठांचे स्थान अतुल्य आहे. याची आठवण हा पुरस्कार माझ्या भावी पिढीला कायम करून देत राहिल. प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त अपर्णा अभ्यंकर यांनी प्रास्ताविक, तर रश्मी तुळजापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.