पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर बरं झालं असतं – अजित पवार
पुणे – नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. तर नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आता या विषयावर स्वत: अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं’, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
वाचा :-मुख्यमंत्री आज औरंगाबाद, लोणारच्या दौऱ्यावर
‘नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मी कशाला नाराज होणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच हे आधीच ठरलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला ठरलं होतं. चर्चा करतात, नाना पटोलेंनी सर्वांशी चर्चा केली. आघाडी सरकारमध्ये चर्चेने मार्ग काढले जातात’, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच ‘काँग्रेसला पदं मिळाली आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र अधिवेशन संपल्यावर नाना पटोलेंनी राजीनामा दिला असता तर अधिक बरं झालं असतं. पण त्यांच्या हायकमांडने निर्णय दिला’, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरातून मिळणार पाठिंबा आणि त्यावर भारतीय सेलिब्रिटींचे ट्विट यावर यावेळी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, ‘सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं. कुणी थांबवलेलं होतं. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही. आपल्या नंदूरबारच्या भगिनीचा मृत्यू झाला. इतकी थंडी असताना तिथं कुणी गेलं नाही. लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केलं नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केलं हेही आपण पाहिलं’, अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ‘धनंजय मुंडेंच्या मुलांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. तक्रार आली की ब्रेकिंग न्यूज, मागे घेतली की हळूच सांगतात’, असे म्हणत त्यांनी माध्यमांनाही खडसावले.