पंधरा लाखांचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते; खासदार अमर साबळे यांचा खुलासा
पिंपरी – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोणत्याही नेत्याने जनतेला “प्रत्येकाच्या बॅंक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे” आश्वासन दिले नव्हते, असा खुलासा राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी आज शनिवारी (दि. 26) पत्रकार परिषदेत केला. तर, मोदी सरकारच्या “स्टार्टअप”, “मेक इन इंडिया”, “स्कील डेव्हलपमेंट” आदी प्रकल्पांचा शहरातील नागरिकांना कितपत फायदा झाला, याचे आकलन नसल्यामुळे भाजपच्या नेत्यांवर “माहिती घेऊन सांगतो”, असे म्हणण्याची वेळ आली. विशेष म्हणजे परिषदेत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर नितीन काळजे दोघांची उपस्थिती नव्हती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा चार वर्षाचा कालावधी आज शनिवारी पूर्ण होत आहे. या कालावधीमध्ये सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत खासदार साबळे यांनी माहिती दिली. यावेळी आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, सदाशिव खाडे, उमा खापरे, महिला अध्यक्षा शैला मोळक, मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, बाबू नायर, प्रमोद निसळ उपस्थित होते.
साबळे म्हणाले की, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कार्यकाळात कल्याणकारी योजना राबिवल्या. विविध योजनांचा फायदा देशातील 22 कोटी गरिबांना झाला. लोकाभिमुख सरकार कसे असावे, याचे उत्तम उदाहरण मोदी सरकार आहे. पाच कोटींपेक्षा अधिक गरजू कुटूंबाना उज्वला योजनेअंतर्गत गॅस देण्यात आले. उच्च अर्थिक स्तरातील लोकांनी गॅस अनुदान सोडल्याने गॅसच्या किमती आटोक्यात आल्या आहेत. 2022 पर्यंत देशातील कोणताही नागरिक झोपडपट्टीमध्ये राहणार नाही. या देशातील एक कोटी लोकांना घरे देण्यात आली. 10 कोटी कुटंबाना 5 लाख रूपये पर्यंत औषधोपचार मिळणार आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत.
स्कील इंडियाव्दारे युवकांना प्रशिक्षण, खेळाडूसाठी अर्थसहाय्य, जन धन आणि जन सुरक्षा, स्वच्छ भारत योजना, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना, मिशन इंद्र्धनुष्यव्दारे मुलांचे लसीकरण आदी योजना मोदी सरकारने सुरू केल्या आहेत. यातील विशेष बाब म्हणजे, यातील योजनांचा शहरातील नागरिकांना कितपत फायदा झाला, याची माहिती विचारली असता भाजपच्या नेत्यांना ती सांगता आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.