पंतप्रधान, रेल्वे मंत्री आणि कृषी मंत्री यांच्या विरोधात आचारसंहिता भंगची तक्रार
शेतकऱ्यांच्या बांधावरचा शेतमाल थेट देशभरातील बाजारपेठेत नेणाऱ्या 100 व्या किसान रेलला 28 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फेरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. याच कार्यक्रमाच्या विरोधात किसान व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
या रेल्वेच्या कार्यक्रमामुळे आदर्श आचारसंहिता भंग झाला आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री नरेंद्र तोमर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आज कदम यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून यासह राज्य निवडणूक अयोग्य व राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार देण्यात आली आहे. याची दाखल न घेतली गेल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा प्रफुल्ल कदम यांनी दिला आहे. आचार संहिता सुरु असताना कोणतीही उद्घाटन करू नयेत असा नियम आहे. तरीहीदेखील हे नियम थेट पंतप्रधान यांनीच मोडल्याने यांच्यासह यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दिली आहे.
सांगोला भागातील डाळिंब, शिमला मिर्च, शेवगा आणि द्राक्षांना तर जेऊर, कंदर परिसरातील केळींना दिल्ली बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या भागात मोठ्या प्रमाणात या दर्जेदार फळ व भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. सध्या सांगोल्यातून रोज 5 ते 6 बोगी भरून डाळिंब व इतर भाजीपाला दिल्लीला व देशभरातील इतर बाजारपेठेत जातो. किसान रेल मधून हा माल अतिशय जलद, सुरक्षित व स्वस्त दरात देशभरात जातो.