पंतप्रधान म्हणजे भुलभुलैया – के. पी.पाटील
बेळगांव – विदेशातील काळा पैसा परत आणतो, महागाई कमी करतो, भ्रष्टाचार कमी करतो, अशी अनेक आश्वासने देऊन पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदींनी जनतेला फसविले आहे. याच पंतप्रधानांच्या काळात राष्ट्रीय बॅंकांची लूट झाली. इंधनाचे दर भडकले. महागाई गगनाला भिडली आहे. हे सामान्य जनतेचे पंतप्रधान नसून भुलभुलैया पंतप्रधान आहेत, अशी टीका माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली.
बेळगाव दक्षिण मतदारसंघातील समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. ९) अनगोळमध्ये महासभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. बी. ओ. येतोजी अध्यक्षस्थानी होते. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ॲड. राम आपटे, कोल्हापूरच्या माजी महापौर हसीना फरास, माजी आमदार के. पी. पाटील, प्राचार्य व्ही. ए. पाटील, माजी महापौर संज्योत बांदेकर, सुभाष ओऊळकर, नगरसेवक विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, प्रा. मधुकर पाटील व्यासपीठावर होते.
यावेळी मराठी अस्मिता आणि संस्कृती टिकवण्याबरोबर सीमालढ्याला बळकटी येण्यासाठी समितीचे उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे. जातीचे राजकारण करून मराठी भाषिकांत फूट पडण्याचा मनसुबा रचणाऱ्या विचारांना गाडण्याची संधी आली आहे. मराठी भाषिकांनी या निवडणुकीत युक्ती व शक्तीचा संगम दाखवून समितीच्या तिन्ही अधिकृत उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.