पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
मुंबई – आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी पंढरीत जवळपास लाखो भाविक दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी व बिग बींनी मराठी भाषेत ट्वीट केलं आहे.
‘आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना’ असं ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशातील नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. यासोबतच पंतप्रधानांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
सभी देशवासियों को आषाढ़ी एकादशी और चातुर्मास की हार्दिक शुभकामनाएं।
आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2019
पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी गेल्या काही दिवसांपासून पायी वाटचाल करणाऱ्या विविध संतसज्जनांच्या पालख्या चंद्रभागातीरी दाखल झाल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील मराठी भाषेत ट्वीट करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विणा || माऊली निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || ||जय जय राम कृष्ण हरी|| आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा’ असं ट्वीट बिग बींनी केलं आहे.
T 3224 – टाळ वाजे, मृदुंग वाजे
वाजे हरीचा विणा ||माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||||जय जय राम कृष्ण हरी||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Jai hari Vitthal !! 🙏🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/f0aLShtsjR— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 12, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे वारकरी शेतकरी दांपत्याच्या हस्ते आज विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडली. विठ्ठलाची पूजा केल्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्र्यांना विचारले की काय मागणे मागितले त्यावर मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे काय मागणार, तो मनातील जाणतो. तरीही मनातील हूरहूर विठ्ठलाकडे मांडली. माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलाय तो सुखी व्हावा, असे साकडे घातल्याचे सांगितले आहे. विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पंढरपूरची वारी निर्मळ व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. आज अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक वारी सुरू आहे. भीमा-चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला आहे. काम मोठे आहे, पण पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.