पंतप्रधान नरेंद्र मोदींना पिंपरीतून महिला पाठविणार बांगड्याचा आहेर
पिंपरी – उन्नाव, कठूआ येथील पीडित मुलींवर घडलेल्या अत्याचारामुळे देशात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. तेथील घडलेल्या घटनांचा पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात मंगळवारी (दि.17) समविचारी सामाजिक संघटनांनी भाजप सरकारचा निषेध नोंदवून आंदोलन केले. तसेच पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी देशातील महिला, मुलींना सुरक्षा देण्यास अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपरोधितपणे बांगड्याचा आहेर पाठविण्याचा निर्धार आंदोलनातील महिलांनी केला आहे.
जम्मू काश्मिरमधील कठूअा येथील आठ वर्षाच्या मुलीवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये भाजप आमदाराने मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे देशात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. या बलात्कार घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. यावेळी सुरेश निकाळजे, भीमराव तुरुकमारे, अजय लोंढे, रजनीकांत क्षीरसागर, संजय कांबळे, संगिता शहा, अमोल उबाळे, भारत मीरपगारे यासह अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी भीमराव तुरुकमारे म्हणाले की, या घटनेमागे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा सहभाग असणे, हे मोठे दुदैवी आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने पीडित कुटूंबाला न्याय देण्याएेवजी त्या आमदारांना सरकारने पाठबळ दिले होते. लोकांचा उद्रेक झाल्यानंतर त्या आमदारांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. तोपर्यत उन्नाव मधील पीडित मुलींच्या वडीलांना न्याय मिळाला नाही. उलट पोलिसांना मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला. तसेच जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये केवळ आठ वर्षाच्या मुलींवर मंदीरात अत्याचार झाला. तरीही त्या आरोपींना कडक कारवाई होत नाही. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात महिला, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा एेरणीवर आला असून हे सरकार कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
याप्रसंगी संगिता शहा म्हणाल्या की, देशात महिला, मुलींचा सुरक्षा धोक्यात आली आहे. लहान मुलींवर नराधाम अत्याचार करु लागले आहेत. त्यांना तेथील भाजप सरकार पाठिशी घातलत आहे. युपीए सरकारच्या काळात निर्भया घटनेनंतर भाजपच्या स्मृती इराणींनी तत्कालीन पंतप्रधानांना बांगड्याचा घालण्याचा सुचक इशारा दिला होता. पंरतू, कठूआ व उन्नत प्रकरणात स्मृती इराणी चिडीचुप भूमिका घेतली आहे. त्यामुळे देशातील महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याने विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांगड्या पाठविण्याचा निर्धार आंदोलनातून करण्यात आला आहे.