निसर्ग चक्रीवादळ : शरद पवारांना आता जाग आली का? : चंद्रकांत पाटील
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोकणात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाल्यामुळे भाजपने तेथे तातडीने मदत पोहोचवली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना जाग आली. आता त्यांना कोकण दौरा करावासा वाटतोय,’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तीन महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांनीही भाजपचे नेते तेथे गेल्यानंतरच कोकण दौरा केला असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
गत आठवड्यात कोकणच्या किनाऱ्यावर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगडमधील वादळग्रस्त भागाचा दौरा केला होता. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी त्यांनी तातडीची मदतही जाहीर केली होती. या दौऱ्यानंतर त्यांची शरद पवारांसोबत चर्चाही झाली होती. त्यानंतर आता शरद पवार कोकणचा दौरा करत आहेत. त्याच मुद्द्यावरून पाटील यांनी सोमवारी पवारांसह मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली.
सरकारला नुकसानीचा अंदाज आला नाही…
महाविकास आघाडीच्या ‘या सरकारला नुकसानीचा अंदाजच आला नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली २०० कोटी रुपयांची मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. येथे हेक्टरी अथवा एकरी यावर नुकसानभरपाई देणे चुकीचे आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू अशी उत्पन्न देणारी झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. तेथे नवीन झाड लावल्यानंतर पुढील दहा वर्षे उत्पन्न मिळणार नाही. हे गृहित धरून भरपाई देणे आवश्यक आहे,’ असं पाटील म्हणाले.
भाजपाचे नेते सर्वांत आधी पोहोचले…
कोकणाला वादळाचा तडाखा बसताच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तातडीने तिथे पोहोचले. भाजपचे अनेक स्थानिक आमदार तेथे गेले. त्यांनी मदत केली. भाजपने पत्रे, ताडपत्रे व प्लास्टिक असा सोळा ट्रक माल रवाना केला. आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व पवारांना उशिरा जाग आल्याचा आरोपही पाटील यांनी केला.