निवडणूकीपूर्वी देशात दंगली घडणार, त्यासाठी रणनिती तयार- प्रकाश आंबेडकर
मुंबई: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी देशात दंगली घडवल्या जाणार आहेत. त्यासाठी माणसेही तयार ठेवली आहेत. दोन दिवसापूर्वी झालेली बुलंदशरची दंगल त्या व्यापक कटाचाच भाग आहे. आधी भीमा कोरेगाव झाले आता अयोध्याचा नंबर आहे, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महानिर्वाणदिनानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आंबेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देशभरातील विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी व दलित नेते उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 1956 साली नागपूरला दीक्षा समारोह झाला आणि पुढे इतिहास रचला गेला. आताही 2019 साली इतिहास घडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र, संविधान विरोधी भाजपला आपल्याला सत्तेतून हद्दपार करायचे आहे. युद्धात सर्व काही माफ असते याचपद्धतीने आता निवडणूका लढवल्या जात आहेत. युद्ध आणि निवडणूका सारख्याच मानल्या जात आहेत. त्यामुळे आपल्याला भावनिक होऊन चालणार नाही तर रणनिती आखून लढाईला समोरे जावे लागेल. 2019 मध्ये क्रांती आणि प्रतिकांती यांच्यात आमना- सामना असून, संविधान बचाव लढाई तुम्हा-आम्हा सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची आहे, असे आवाहनही त्यांनी दलित समाजाला केले.
भाजप सरकार मराठा आणि ओबीसी वर्गात भांडण लावत असल्याचा आरोप करत आंबेडकर पुढे म्हणाले की, राज्यातील फडणवीस सरकारने मराठा समाजाला मनापासून नव्हे तर डोक्याने आरक्षण दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर दिलेले आरक्षण हे केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी दिलेले आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातीलच आरक्षण देऊन दोन समाजात भांडणे लावण्याचा सरकारचा डाव आहे. ओबीसी संघटना आक्रमक होत असून, त्या मोर्चे काढण्याच्या विचारात आहेत. असे करून राज्यातील, देशातील वातावरण बिघडवायचे व सत्ता हस्तगत करायची ही भाजपची रणनिती आहे.