breaking-newsराष्ट्रिय

निर्भया खटला अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्याची पालकांची मागणी

दिल्ली:- दिल्लीमध्ये २०१२ मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला दुसऱ्या न्यायाधीशांपुढे चालविण्यात यावा, यासाठी पीडित मुलीच्या पालकांनी केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.या बलात्कार प्रकरणात दोषींना ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी तिहार कारागृहाच्या अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणीही पीडितेच्या पालकांनी केली आहे. याबाबत न्यायालय २५ नोव्हेंबरला सुनावणी घेणार आहे.आतापर्यंत निर्भया प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या दोन न्यायाधीशांची बदली झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सातत्याने तहकूब करावी लागत आहे. हे लक्षात घेऊन मुलीच्या पालकांनी हा खटला दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे, असे यासंबंधीच्या अर्जात म्हटले आहे.लैंगिक छळाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी पटियाला हाऊस न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या जलदगती न्यायालयात सध्या न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत. या पदांवर अद्याप कोणाचीही नेमणूक झालेली नाही.

निर्भया प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्यांनी आतापर्यंत मृत्युदंडाची शिक्षा टाळण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, असे मुलीच्या पालकांनी अर्जात म्हटले आहे.‘निर्भया’ ही २३ वर्षीय तरुणी निमवैद्यकीय क्षेत्रात काम करीत होती. डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत तिच्यावर क्रूरपणे सामूहिक बलात्कार झाला होता. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू ओढवला होता. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, चारही आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मुलीच्या पालकांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केली होती.या प्रकरणातील दोषी ठरविण्यात आलेल्या मुकेश, पवन, विनय आणि अक्षय यांना ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती. ही याचिका १२ डिसेंबर २०१८ रोजी फेटाळण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button