नालासोपाऱ्यात पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे 19 वर्षीय तरुणीचा बळी
मुंबई | उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील घटनेने संपूर्ण देश ढवळून निघत असताना, नालासोपाऱ्यातही पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे 19 वर्षीय तरुणीचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
लग्नाचं अमिष दाखवून पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. यावरून तुलिंज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र यादरम्यान पीडित तरुणीचा तापासाधिकारी पोलीस आणि परिसरातील काही तरुणांकडून मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या आई वडिलांनी केला आहे. सध्या तरी तुलिंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
या पीडित तरुणीचे सुनील माने या तरुणाशी ऑगस्ट महिन्यात प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेम संबंधातून दोघे लग्न करणार होते. पण प्रियकराने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने 15 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या आईसोबत तुलिंज पोलीस ठाण्यात जाऊन प्रियकर सुनील माने याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.