breaking-newsराष्ट्रिय

नाराज विजेत्यांना पोस्टाने पाठवणार चित्रपट पुरस्कार?

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून विचार सुरू 
नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यावर 50 हून अधिक विजेत्यांनी नाराजीपोटी बहिष्कार टाकला. आता त्या विजेत्यांना पोस्टाने पुरस्कार पाठवण्याचा विचार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय करत आहे.

देशाची राजधानी दिल्लीत 3 मे यादिवशी झालेल्या सोहळ्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंपरेनुसार राष्ट्रपतींच्या हस्ते सर्व पुरस्कार प्रदान केले जातात. मात्र, यावेळी त्या परंपरेला फाटा देण्यात आला. त्यानुसार निवडक 11 पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदान केले. उर्वरित पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी तसेच राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते निवडक पुरस्कारच दिले जाणार असल्याची माहिती अंतिम क्षणी मिळाल्याने अनेक विजेते नाराज झाले. त्यातून 70 हून अधिक कलाकारांनी खुले पत्र जारी करून पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकत असल्याचा निर्णय जाहीर केला. अर्थात, काही कलाकारांनी नंतर हा निर्णय मागे घेतला. तरीही 50 हून अधिक विजेते सोहळ्यापासून दूरच राहिले.

या पार्श्‍वभूमीवर, सोहळ्यावेळी अनुपस्थित राहिलेल्या कलाकारांना पोस्टाने पुरस्कार पाठवण्याचा विचार माहिती आणि प्रसारण मंत्रालय करत आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. कुठल्या कारणामुळे पुरस्कार स्वीकारू न शकलेल्यांना तो पोस्टाने पाठवण्याची प्रक्रिया नवी नाही, अशी भूमिका यासंदर्भात मंत्रालयाच्या सुत्रांकडून मांडण्यात आली. मानपत्र, पदक आणि धनादेश असे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे स्वरूप आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button