नारद म्हणजे प्राचीन काळातील गुगल, बिप्लब देब यांच्यानंतर विजय रुपाणी यांचा जावईशोध
दिल्ली – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी महाभारतावेळी इंटरनेट असल्याचं वक्तव्य केल्यानंत सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असताना आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीदेखील असंच एक वक्तव्य केलं आहे. विजय रुपाणी यांनी नारद आणि गुगल यांच्यात तुलना करत दोघांनाही समान स्तरावर आणलं आहे. ‘ज्याप्रकारे सर्च इंजिन गुगल आज सगळी माहिती देतं, त्याचप्रमाणे प्राचीन काळात नारद सर्व गोष्टींची माहिती ठेवत असे’, असं विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना विजय रुपाणी यांनी हे वक्तव्य केलं. ‘नारद यांच्याकडे जगातील प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. त्याचप्रमाणे आज गुगल माहितीचं एक स्तोत्र आहे. जगात काय घडतं आहे, याची प्रत्येक माहिती गुगलवर उपलब्ध असते’, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. पुढे ते बोलले की, ‘माणुसकीच्या भल्यासाठी सर्व माहिती जमा करणं नारदचं काम होतं. हेच त्यांचं कर्तव्य होतं, ज्याची अत्यंत गरज होती’. विजय रुपाणी यांनी यावेळी लोकशाही देशात तटस्थ प्रसारमाध्यमांची गरज असल्याचंही म्हटलं.
विजय रुपाणी यांच्याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब आपल्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत होते. देब यांनी महाभारताच्या वेळी इंटरनेट होत असं वक्तव्य केलं होतं. एवढेच नाही तर महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधाही उपलब्ध होत्या असंही ते बोलले होते. आगरताळा या ठिकाणी असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते. महाभारतात जे युद्ध झाले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले. संजय हे डोळ्यांनी युद्ध पाहू शकले कारण त्याला इंटरनेट कारणीभूत आहे असे देब यांनी म्हटलं होतं. इंटरनेट आणि सॅटेलाइट महाभारत काळापासून होते हेच संजय यांच्या दिव्यदृष्टीमागचे कारण होते असेही देब यांनी म्हटलं.