नव्या शब्दांची मराठीत घुसखोरी
पुणे – क़ाळानुसार माणूस, समाज, जीवनपद्धती यात जसा होतो, तसाच बदल आता भाषेतही झाला आहे. मराठीच्या स्वरूपासंबंधी विचार करताना प्रामुख्याने तिचे झपाट्याने बदलत चाललेले रूप दिसून येते. पिढीनुसार भाषेत बदल होत आहेत. विशेषत: तरुण पिढी जशी मराठी बोलते किंवा लिहिते, ती इतकी मिश्रित असते, ही हल्ली तिला “मिंग्लिश’ किंवा “हिमिंग्लिश’ म्हटले जाते.
मराठी प्रचंड संपन्न भाषा आहे. तिची शब्दसंपत्ती समृद्ध आहे. सूक्ष्म-अतिसूक्ष्म आशय व्यक्त करण्याची ताकद या भाषेत आहे. पण आज जाणवते ते असे, की मराठीतून अनेक शब्द, वाक्प्रचार, म्हणी लुप्त होत आहेत. मोजक्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी म्हणजे भाषेतील अत्यंत अमूल्य असा खजिनाच. पण, ते आता फारसे वापरात नसल्याचे चित्र आहे. शिवाय बरेचसे वाक्प्रचार आजच्या मराठीतून नष्ट झाले आहेत. त्याजागी काही नवे वाक्प्रचार तरुणांच्या तोंडी ऐकायला मिळतात. आता नव्या पिढीकडून अनेक जुन्या म्हणी, वाक्यप्रचार त्याच अर्थाने नव्या रुपात तरुणाई बोलते.
नवीन म्हणी, वाक्प्रचारांची काही उदाहरणे
पंगा घेणे, पोपट झाला रे…, लोच्या झाला रे…, डोक्यात गेलाय, डोक्यावर पडलायेस का? इ. प्रयोग पावलोपावली ऐकू येतात. “नादी लागू नये’च्या ऐवजी आता “पंगा घेऊ नये’ असा नवा शब्द आला आहे. “घोळ होणे’ऐवजी आता “लोच्या होणे’, फजिती होणे-“पोपट होणे’ असे नवे शब्दप्रयोग सध्या वापरले जात आहेत. “वेड्यात काढू नकोस’ असे जर एखाद्याला सांगायचे असल्यास..”मी काय पौडवरून आलो नाही’ असा प्रयोग केला जातो. “हुशार आहेस’ असे सांगायचे झाल्यास-“काय डॉक्यालिटी आहे’ अशा शब्दांत शाबासकी दिली जात आहे. एखाद्याचा राग येत असेल तर “तो माझ्या डोक्यात जातो’ असे बोलले जाते.
- भाषेत इतका बदला कसा झाला?
सोशल मीडिया, टीव्ही, सिमेमा, मालिका अशा माध्यमांतून ज्या शब्दांचा भडिमार होतो, तेच शब्द आपसूकच व्यवहारात येतात आणि भाषेचा भाग बनून जातात. “सोशल मीडियाची भाषा ही तरुणाईची भाषा’ असे म्हणून त्याबद्दल अभिमानही बाळगला जातो, मात्र त्यात भाषेचे मूळचे सौंदर्य मात्र कमी होत चालले आहे, हे नक्की.