नव्या निर्माणाच्या माध्यमातून संसद भवन अपग्रेड कारण्याचा प्रयत्न- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली – नवीन संसद भवनाची निर्मिती ही नव्या व जुन्याच्या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे. आज १३० कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी अत्यंत सौभाग्याचा व गर्वाचा दिवस आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत आहोत. काळ आणि गरजेच्या अनुषंगाने स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलताना म्हटलं.
‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
वाचा :-नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न
याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन व नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती देखील इथेच झाली व पहिली संसद देखील इथंच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली. आपल्या लोकशाहीची पुर्नस्थापना झाली. संसदेची सध्याची इमारत स्वतंत्र भारताचे प्रत्येक चढ-उतार, आपली प्रत्येक आव्हानं, आपल्या आशा-आकांक्षा, समाधान, आपल्या यशाचे प्रतीक राहिलेली आहे. या इमारतीत बनलेला प्रत्येक कायदा, या कायद्याच्या निर्मिती दरम्यान झालेल्या अनेक गंभीर चर्चा, हे सर्व आपल्या लोकशाहीचा ठेवा आहे. मात्र संसदेच्या शक्तीशाली इतिहासाबरोबरच यथार्थ स्वीकारणे तेवढंच आवश्यक आहे. ही इमारत आता जवळजवळ १०० वर्षांची होत आहे. मागील दशकात तत्कालीन गरजांना लक्षात घेता सातत्याने यामध्ये बदल केले गेले. या प्रक्रियेत अनेकदा भिंती तोडण्यात आल्या आहेत, अन्य सुविधांमध्ये बदल केले गेले. सदस्यांना बसण्यास पुरेसी जागा मिळावी यासाठी भिंती देखील हटवल्या गेल्या आहेत. एवढं सर्व झाल्यानंतर हे संसद भवन आता विश्रांती मागत आहे.”
तसेच, “आता लोकसभा अध्यक्ष देखील सांगत होते, की कशाप्रकारे अनेक वर्षांपासून अडचणींची परिस्थिती राहिलेली आहे. अनेक वर्षांपासून नव्या संसद भवनाची गरज जाणवलेली आहे. अशावेळी हे आपल्या सर्वांचे दायित्व ठरते की २१ व्या शतकातील भारताला आता एक नवे संसद भवन मिळावे. याच दिशेने आज हा नवा शुभारंभ होत आहे.” असं देखील मोदी म्हणाले.