नद्यामधील जलपर्णी हटाव ; मनसेची आग्रही मागणी
पिंपरी – पवना आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. जलपर्णी न हटविल्यामुळे नदीकाठ भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांना डासांच्या त्रासामुळे डेंग्यू, मलेरिया, ताप या सारखे साथीचे आजार बळावू लागले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात यावी, याकरिता मनसेने आज(बुधवारी) महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. यावेळी मनसेचे गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिव राजू सावळे, रुपेश पटेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जलपणी काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. पवना, इंद्रायणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. त्या जलपर्णीमुळे नद्यांना गटारीचे स्वरुप आले आहे. जलपर्णी वेळेत न काढल्याने ठेकेदारांची बिले काढण्याचे उद्योग केले जात आहेत. दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर सर्व जलपर्णी पाण्यामुळे वाहून जाते. तरीही अधिकारी व ठेकेदार मिळून कारभार करु लागले आहेत. वेळेत जलपर्णी न काढणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.