धक्कादायक! चंद्रपूर मध्ये तळ्याकाठी आणखी दोन वाघांचे मृतदेह, ताडोबातील संपूर्ण तलावात विष कालवलं?
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेली आहे. 10 जून रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीतारामपेठ या गावालगतच्या तळ्याच्या काठावर एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चर्चा अजून सुरुच असताना, याच भागातल्या घनदाट जंगलात आणखी दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळून आलेले आहेत. अवघ्या चारच दिवसात तीन वाघ मृत आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे.
या भागातील गस्ती पथकाला कुजलेल्या अवस्थेतील हे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह एक ते दीड वर्षे वयाच्या प्रौढ होऊ घातलेल्या बछड्यांचे असावेत असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे मृत्यू ज्या तळ्याच्या आसपास झाले आहेत तिथेच काही माकडांचा ही मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे.