देशासाठी चार राजधानी पाहिजेत : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
कोलकाता । टीम ऑनलाईन
भारतासाठी 4 फिरत्या राजधानी असल्या पाहिजेत आणि संसदेचे अधिवेशन देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जावे,अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केली.
त्या म्हणाल्या, ब्रिटीश काळात कोलकाता ही देशाची राजधानी होती. मला असे वाटते की एकापाठोपाठ आपल्याकडे चार राजधानी असाव्यात. देशाची एकच राजधानी का असावी? संसदेचे अधिवेशन देशात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जावे. आपल्याला आपली संकल्पना बदलावी लागेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरे करण्याच्या निर्णयाबद्दल केंद्र सरकारची निंदा केली. त्या म्हणाल्या की नरेंद्र मोदी सरकारने घोषणा करण्यापूर्वी माझा सल्ला घेतला नाही. बोस यांची जयंती ‘देशनायक दिन’ म्हणून का साजरी केली जाऊ नये, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नेताजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भव्य मिरवणुकीत सामील झाल्यानंतर येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी केंद्र सरकारच्या परस्पर निर्णय घेण्याबद्दल टिका केली.