देशात माता मृत्यू दरात कमालीची घट
नवी दिल्ली : देशात माता मृत्यू दरात कमालीची घट झाली असून १९९० मध्ये एक लाख जन्मांमागे ५५६ इतका असलेला माता मृत्यू दर २०१६मध्ये १३०पर्यंत खाली आणण्यात यश आले आहे. सन २०३०पर्यंत हा दर ७०पर्यंत आणण्याचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने भारत प्रगतीपथावर असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने भारताची पाठ थोपटली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या संचालक पूनम खेत्रपाल यांनी याबाबत भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारताने गर्भवती मातांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने लक्षणीय प्रयत्न केले असून २००५च्या तुलनेत यासंबंधीच्या सुविधा दुप्पट मातांपर्यंत पोहचत आहेत. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसुतींचे प्रमाण २००५मधील १८ टक्क्यांवरून तिप्पट होऊन २०१६मध्ये ५२ टक्के झाले आहे. खासगी रुग्णालयांमदील प्रसुतीही गृहीत धरल्या, तर हे प्रमाण ७९ टक्के आहे, असे खेत्रपाल यांनी सांगितले. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक रुग्णालयांमध्ये निशुल्क प्रवास व प्रसुतीमुळे याबाबत शहरी व ग्रामीण भागात असलेली तफावत दूर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याखेरीज सरकारी व खासगी रुग्णालयांच्या समन्वय, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत गरोदरपणातील तपासण्या, स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला यांची वाढलेली उपलब्धता, जोखमीच्या प्रसुतींवर लक्ष ठेवणे आदींचा सकारात्मक परिणाम झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.