दुबईत भीषण अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू
दुबईत बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये आठ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जून रोजी गुरुवारी हा अपघात झाला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बसमधून एकूण ३१ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राशीदिया एक्झिटजवळ असताना बसने सिग्नल तोडला असता हा अपघात झाला.
या अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वेगवेगळ्या देशातील नागरिकांचा समावेश आहे. पाच जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. जखमींना तात्काळ दुबईमधील राशीद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे चार भारतीयांना प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आलं. काही जखमींवर अद्याप उपचार सुरु आहे.
स्थानिक प्रशासनाने भारतीय दुतावासाला आठ भारतीयांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. सर्व मृतांची ओळख पटली आहेत. राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.
मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांच्या संपर्कात आपण असल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. त्यांनी हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. ट्विटमध्ये मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. आमचे अधिकारी संजय कुमार (+971-504565441or +971-565463903) यांच्याशी संपर्क साधू शकता अशी माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.